मऊभात (MauBhaat)

आज इथे बे एरीआत मस्त उन-पावसाचा लपाछपीचा खेळ चाललाय, अगदी श्रावण असल्यासारखा... छान गार हवा आहे. अश्या हवेत गरमागरम मऊभात म्हणजे आहा!
नुसता भात नाही तर त्यावर भुरभूरव्लेलं मेतकुट, दह्याची कवडी, लिंबाच्या लोणच्यातली फोड आणि पेणचे पोह्याचे पापड.. सुखी माणसाचं जेवण...

आमच्या लहानपणी ,चरवेलीला, म्हणजे आमच्या रत्नागिरीच्या घरी मऊभात हा रोजचा ब्रेकफास्ट असायचा... सकाळी सकाळी ताटभर भात जेवून माणसं कामाला लागायची... अजूनही अनेक घरांमध्ये मऊभाताची न्याहरी असते. माझी आईही बऱ्याचदा सकाळी मऊभात करत असते.

हा आपल्या सध्या भातासारखाच पण नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट पाणी घालून छानपैकी घोटून घोटून केलेला असतो. काही लोक त्याला "गुरगुट्या भात" अश्या गोंडस नावानेही ओळखतात.. बाकी काहीजण त्याला पात्तळ-भात म्हणतात...  भात शिजत असतानाच त्यात तूप घातलं तर घरभर इतका सुंदर वास पसरतो.. आत्ता सध्या आमच्याकडे आंबेमोहोर तांदूळ आहे. त्यासोबत साजूक तुपाचा वास म्हणजे डायरेक्ट पहिल्या पावसानंतर मातीच्या वासाशी competition!

तर, लहानपणी चरवेलीला सकाळी उठल्यावर एक भलं-मोठ्ठं पातेलं पडवीतल्या चुलीवर ठेवलं जायचं आणि त्यात जवळजवळ १०-१५ लोकांसाठी मऊभात लावला जायचा... चुलीचा विषय निघालेलाच आहे म्हणून :


ह्या चुलीवर भात रटरटत असायचा.. आमचं आवरून होईतो भात शिजलेला असायचा आणि मग त्याच चुलीतल्या निखाऱ्यांवर आम्ही पोह्याचे पापड भाजायचो. दर सुट्टीत अलिबागहून रत्नागिरीला जाताना आमचा पेण किंवा इंदापूरचा stopठरलेला.. तिथे उतरून पोहे आणि पापड घ्यायचे आणि मग पुढे जायचं.. पेणचे गणपती आणि पेणचे पापड ह्यांना जगात दुसरा बेटर पर्याय नाही! 

सकाळच्या न्याहरीची पानं आम्ही मुलंच घ्यायचो, कारण आमच्या आया दुपारच्या जेवणाच्या तयारीत लागलेल्या असायच्या... छानपैकी मोठ्ठा गोल करून आम्ही सगळे बसायचो.. एकमेकांना वाढायचो.. अनेक "असं का?" प्रश्न पडणारे नियम तेंव्हाच शिकलो आम्ही.. "रिकाम्या पानात भात वाढायचा नाही" .. मी अजूनही पाळते हा नियम.. नवरा कायम विचारतो "असं का?" .. आणि मी कायम नवनवीन कारणं बनवून सांगते.. पटेल असं कारण माझ्याकडे नाही पण आता तो नियम मोडण मनाला पटत नाही. 

गार व्हावा म्हणून भात पसरून वाढायचो आम्ही.. आणि तरीही रोज कोणाचातरी हात भाजायचा.. मग आत्या असली कि ती चाणक्य आणि बाईची गोष्ट सांगायची... चंदगुप्त आणि चाणक्य वेषांतर करून फिरत असताना एकदा दुपारी एका बाईच्या ओसरीत विश्रांतीला बसतात . तेव्हा त्या बाईचं मुल जेवत असतं आणि ते कडे-कडेने न जेवता मध्येच हात घालतं असतं आणि त्यामुळे हात भाजत असतो तेंव्हा ती बाई म्हणते "त्या मूर्ख राजासारखं काय जेवतोस? कडेकडेने राज्य घेत गेला तरचं जिंकू शकेल.. मधोमध वार केला तर कसं चालेल?"  (मुळ गोष्टीत भाकरी आहे बहुतेक.. आत्या आम्हाला मऊभात सांगायची. हि गोष्ट बाकी राजांबद्दलही सांगतात वाटतं.. आणि अजून चांगल्याप्रकारे सांगतात )

सकाळच्या मऊभाताला अजून जास्त चव यायची ते आदल्या रात्रीच्या उरलेल्या कुळथाच्या पिठ्ल्याने... आत्ताही ती चव येत्ये जिभेवर.. मजा यायची.. एकदा पोटभरून भात जेवल्यावर आम्ही हुंडारायला मोकळे.. हा.. मात्र सकाळची पानं आम्हाला  स्वतःची स्वतः  घासायला लागायची.. मग कोणाचं ताट जास्त स्वच्छची शर्यत लागायची.. मुळात भात जेवतानाच इतकं चाटून-पुसून स्वच्छ केलेलं असायचं आम्ही ताट कि घासायचीही गरज पडू नये! 

कालांतराने आता गावच्या पद्धती बदलल्या.. लोकांचा राबताही कमी झाला... जुन्या पद्धती आणि सवयींवर नवीन पदार्थ आणि सवडी- सोयींनी कब्जा केला.. आणि त्यात काहीही गैर नाही! पण अजूनही अधूनमधून जमणाऱ्या सकाळच्या मऊभात पंगतीने बहार येते. 

मी इथे ठिकठीकाणी भात "जेवला" लिहिलं आहे. मध्यंतरी नानिवडेकर काकांनी मेल करून हे सांगितलं होतं. "भात खाल्ला" आणि "भात जेवला" .. काकांनी transitive -intransitive verbs समजावून "खाल्ला" क्रियापद वापरणं अधिक योग्य हे पटवून दिलं होतं.. पण आमच्याकडे मात्र सगळे भात "जेवला"च म्हणतात.. "असं का?" नियम.. काकांचं व्याकरण पटलं तरी माझ्या भाषेत त्याचा उपयोग पटत नाही! :)


Comments

Popular Posts